बहुजननामा ऑनलाईन : सीमा प्रश्नावर भारत आणि चीनमध्ये लवकरच चर्चा होणार आहे. हि बैठक दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी भारताकडून NSA अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यामध्ये होणार आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे व त्या राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयानंतर भारत-चीनमध्ये सीमा प्रश्नी ही पहिली बैठक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या अनौपचारीक परिषदेआधी डोवाल आणि वँग यांच्यात ही बैठक होऊ शकते.
बैठकीचा निर्णय भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या दोन दिवसीय चीन दौऱ्यात सीमा प्रश्नांवर घेण्यात आला. गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि चीनमध्ये सीमावाद आहे. जम्मू-काश्मीरचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय झाल्यानंतर ही बैठक आवश्यक आहे. कारण लडाखची सीमा चीनला लागून आहे. सीमा प्रश्नावर चीनकडून भारताला काही प्रस्ताव देण्यात आल्याचे वँग यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना सांगितले. चीनकडून आलेले प्रस्ताव म्हणजे सीमावादावर तोडगा काढण्याची त्यांची इच्छा असल्याचे संकेत आहेत.
भारताची नेहमीच सीमा वादावर तोडगा काढण्याची इच्छा राहिली आहे. पण या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या मते सीमावाद सोडवण्याला गती देण्याची चीनची इच्छा कधीच दिसली नाही. भारताने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनने भारताने जम्मू-काश्मीरसंदर्भात एकतर्फी निर्णय घेणे टाळले पाहिजे तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यावरही आक्षेप घेतला. लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याचा निर्णय मान्य नसल्याचे चीनने म्हटले आहे.