सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग येथे आले असताना ते कोरेगाव-भीमा बद्दल बोलत होते. कोरेगाव-भीमा आणि एल्गार परिषद या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वतःकडे घेतला आहे, कोरेगाव-भीमाचा नाही. तसेच कोरेगाव-भीमामध्ये दलित बांधवांवर अत्याचार झाला असताना हा तपास केंद्राकडे कोणत्याही परिस्थितीत देणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वत:कडे घेतला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास काढून घेतलेला नाही. माझ्या दलित बांधवाचा जो विषय आहे तो भीमा-कोरेगावबाबत आहे आणि भीमा-कोरेगावचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, तो केंद्राकडे देणार नाही.’ पुढे ठाकरे यांनी केंद्र सरकारचं एनआरसी, सीएए आणि एमपीए याबद्दल बोलताना ते तीनही वेगळे विषय असल्याचे म्हटले आहे. तर शिवसेनेचा नाणार रिफायनरी प्रकल्पाला कायम विरोध राहणार आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प सुरू होण्याचा प्रश्नच येत नाही.
हा प्रकल्प मी सुरू होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सिंधुदुर्गासाठी सिंधुरत्न समृद्ध विकास ही नवीन योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली. या योजनेतून हॉस्पिटल, पूर, पर्यटन, नळपाणी योजना, घरबांधणी, दुष्काळ आणि डिझेलचा परतावा आदी कामे केली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. यादरम्यान खासदार विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब आणि उदय सामंत हेही उपस्थित होते.