कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या महापूराचा आजचा सातवा दिवस आहे. कोल्हापूरच्या काही भागांमध्ये सातव्या दिवसानंतरही पाणी ओसरलं नाही. उद्या मुस्लीम समाजाचा बकरी ईद हा सण आहे. मात्र पूरात लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांच्या कोल्हापूरातील मुस्लीम समाजाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बकरी ईदच्या दिवशी बकरीची कुर्बानी न देता पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
कोल्हापूरात मागील सात दिवसांपासून महापूर आला आहे. शहरातील सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर त्यासोबतच सांगलीतही महापूराने थैमान घातले आहे. शेतकरी वर्ग, मुक्या प्राण्यांचे हाल झाले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीची आणि बचावकार्य सुरु आहे. सोमवारी मुस्लीमांचा बकरी ईदचा सण आहे. त्यानिमित्त मुस्लीम बांधवांकडून बकरी ईदला बकरीची कुर्बानी देतात. मात्र यंदा कोल्हापूरातील मुस्लीम समाजाने आता पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. बकरीवर होणारा खर्च टाळून ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ती रक्कम देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.