बहुजननामा ऑनलाईन टीम – गेल्या १५ दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरत पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. या पुरात अडकलेल्या नागरिकांना प्रशासनने बाहेर जरी काढले असले तरी अनेक नागरिक अजूनही अडकल्याने बचाव कार्य सुरूच आहे. या पुरातून जवळपास २३९ गावांमधून १ लाख ११ हजार नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पर्यंत दोन गावांमधून जवळपास १०० टक्के कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरूच आहे. पंचगंगांची पातळी दोन फुटांनी घटली असून याचा दिलासा नागरिकांबरोबरच बचाव कार्यवाही मिळाला आहे. यामुळे बचावकार्याला मदत मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुक्यात ३० बोटी पाठवण्यात आले असून जीवनावशक्य वस्तूंचा पुरवठाही अनेक ठिकाणी करण्यात येत आहे. आणि याचा आढावाही घेतला जात आहे. पुरामुळे ज्या घरांचे, गावांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करण्यासाठी पथकेही तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वीजजोडणीचे कामही पाणी ओसरल्यानंतर लवकरच करण्यात येईल अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. अतिरिक्त वस्तूंच्या पुरवठ्याविषयी माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी संगितले की आमच्याकडे ६९ हजार लिटर डिझेलचा राखीव साठा असून बचावकार्यात लागणाऱ्या वाहनांसाठी याचा वापर करण्यात येईल. पाणी कमी होताच जिल्ह्यातील ४०० पाणी पुरवठा योजना लवकरच चालू करण्यात येतील.
या सगळ्या परिस्थितीचा आढावा सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन करत असून त्यांनी या पुराची हवाई पाहणी केली आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.