बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी शेतकरी पेन्शन योजनेची घोषणा सुरु केली होती. .आजपासून या योजनेला सुरुवात होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर दिल्लीतून या योजनेची सुरुवात करणार आहेत. देशातील ५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे जेव्हा शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी योजना सुरू केली जाईल.
अशी आहे ही योजना
केंद्र सरकारने किसान पेंशन योजना शेतकऱ्यांसाठी आजपासून सुरु केली आहे. ही देशभरातील अल्प व अल्पभूधारक शेतकरी (एसएमएफ) साठी एक ऐच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना आहे. या योजनेसाठी १८ ते ४० वर्षांपर्यंतचे शेतकरी अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ५० रुपयांपासून १००, १५० रुपयांपर्यंत रोख रक्कम दरमहिन्याला भरावी लागेल. तसेच स्किममध्ये गुंतवणुक करणाऱ्या शेतकऱ्यांना ६० वर्षाचे झाल्यानंतर दर महिन्याला ३००० रुपये पेंशन म्हणून मिळणार आहेत. तसेच पेंशन योजनेत नाव असलेल्या शेतकऱ्यांचा मृत्य़ू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ५० टक्के रक्कम देण्यात येईल. म्हणजे १५०० रुपये मिळतील. तसेच ही योजना जीवन विमा निगम यांच्यातर्फे चालवली जाणार आहे.
नोंदणी कशी करावी –
प्रधानमंत्री किसान निवृत्तीवेतन योजनेसाठी किसान कॉल सेंटर क्रमांक -१८००-१८०-१५५१ वर कॉल करून माहिती मिळू शकते. या व्यतिरिक्त कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आणि राज्य नोडल ऑफिसर (पीएम-किसान) वर नोंदणी केली जाईल.
नोंदणीसाठी लागतात ही कागदपत्रे
योजनेची नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, जमिनीचा सात-बारा, बँक पासबुक, रेशन कार्ड, २ फोटो अशा कागदपत्रांची गरज असणार आहे. तसंच कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार किसान कॉमन सर्व्हिस सेंटर तर्फे या योजनेत नोंदणी करू शकता. तसंच शेतकरी आपल्या जिल्ह्यातील लेखापाल आणि कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकतात. या योजने अंतर्गत १२ कोटी शेतऱ्यांना योजनेचा फायदा करून देणे हा उद्देश आहे. पुढच्या आठवड्यात यांची नोंदणी सुरु होणार असून सरकारकडून याबाबत माहिती दिली.