मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पूरस्थिती पाहता ११ ऑगस्ट रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती ११ ऑगस्ट ऐवजी आता २४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा राज्य कर निरीक्षक पदासाठी मुख्यपरीक्षेचा पेपर क्रमांक २ ची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. परंतु राज्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह कोकणात पावसामुळे आलेल्या महापूराने थैमान घातले आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा फटका परीक्षार्थींनाही बसण्याची शक्यता आहे.यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मागील चार दिवसांपासून महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अद्यापही तेथे मदतकार्य सुरु आहे. मागील चार दिवसात अनेकांना आपले प्राण या महापूरात गमवावे लागले आहेत. राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर आता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांना मात्र दिलासा मिळाला आहे.