यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – जिजाऊ ब्रिगेड ही महिलांच्या न्याय, हक्कासाठी व महिलांवर झालेल्या अन्यायाविरोधात मागील २५ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर काम करीत आहे. अनेक समाजोपयोगी कामासाठी व महिलांच्या आत्मसन्मानासाठी आक्रमकपणे जिजाऊ ब्रिगेड आपली भूमिका चोखपणे बजावत आहे, असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष सरोज देशमुख यांनी केले.
जिजाऊ ब्रिगेड यवतमाळच्या वतीने जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कतृर्त्ववान महिलांना उमरखेड येथील संजोग भवनात जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी देशमुख बोलत होत्या. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा डॉ. रेखा चव्हाण होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष मीनाक्षी सावळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. नलिनी ठाकरे, रजनी मुडे, पुष्पा चव्हाण, वनिता देवसरकर, कुसुम गीरी, सरोज मांडवगडे, अरेफाबानो अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ९ महिलांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.
मनीषा ठाकरे, राधिका आव्हाड (यवतमाळ), प्रीती धामणकर (उमरखेड) यांच्यासह इतर महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना वानखेडे, रक्षा माने, नंदा तावडे, सागर शिन्दे, कविता चव्हाण, आशा कल्याणे, रेखा भुते, सपना चौधरी, वंदना घाडगे, कविता देवसरकर, छाया भोयर यांनी परिश्रम घेतले. संचालन निशा कदम, शोभा राऊत यांनी तर आभार नंदा तावडे यांनी मानले.