नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुर आहे. याच दरम्यान BCCI ने खेळाडूंसाठी तयार केलेल्या बायो-बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केला. यामुळे अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे आयपीएलचे 14 वे पर्व स्थगित करावे लागले. या लीगमधील उर्वरीत 31 सामने कोठे खेळवायचे यासाठी BCCI ने प्रयत्न सुरु केला आहे. IPL 2021 लीग स्थगित झाल्यानंतर भारतात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर अनिश्चिततेचं सावट आहे. यासाठी BCCI नं 29 मे रोजी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपचे यजमानपद भारताकडे असल्याचे सांगितले जात आहे.
वर्ल्ड कपसाठी UAE हा पर्याय
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयसीसी व बीसीसीआयनं संयुक्त अरब अमिराती (UAE) हा पर्याय ठेवला आहे. मात्र हा प्लान बी आहे. कोरोनाची जुलै महिन्यातील परिस्थिती पाहून बीसीसीआय UAE मध्ये वर्ल्ड कप खेळवण्याचा विचार करेल. सध्यातरी वर्ल्ड कपचे यजमानपद भारताकडे आहे. BCCI देखील तसाच विचार करुन नियोजन करत आहे. कोरोनामुळे जर परिस्थिती बिघडली तर पुढील विचार केला जाणार आहे. हा निर्णय जून महिन्यानंतर घेतला जाणार असून UAE हा दुसरा पर्याय असल्याचे BCCI च्या सूत्रांनी सांगितले.
IPL चे 31 सामने लंडनमध्ये
29 मे रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये आयपीएलच्या उर्वरीत 31 सामन्यांबाबत चर्चा होणार आहे. भारताचा संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ सप्टेंबर पर्यंत तिथे असणार असून या कालावधीत कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी लंडन या पर्यायाचा विचार सुरु आहे. इंग्लिश कौंटी क्लबानं आयपीएल आयोजनाचा प्रस्ताव BCCI समोर ठेवला आहे. त्याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचाही पाठिंबा आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स यांच्यासाठी देखील ते सोईचे ठरणार आहे.
लंडमध्ये IPL आयोजन स्वस्त पडेल
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, लंडनमध्ये आयपीएल आयोजन स्वस्त पडेल. शिवाय लंडन सरकार क्रीडा स्पर्धांना प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देणार आहे. त्यामुळे फ्रँचायझी मालकांना अधिक पैसा कमवता येईल. आतापर्यंत BCCI च्या डोक्यात हाच प्लान सुरु होता.
कसोटी मालिकेत बदल
भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे बहुतांश खेळाडू हे इंग्लंडमध्ये असणार आहेत. त्यामुळे तिथे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन करणे सोपे जाईल. तसेच इतर देशांच्या खेळाडूंना लंडनमध्ये येणे सोपे जाईल. BCCI आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाची चर्चा सुरु आहे. यासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करता येईल, का असाही विचार सुरु आहे.