बीड : बहुजननामा ऑनलाईन- महाराष्ट्रात खतांच्या वाढत्या दराबाबत चर्चा असताना यावरून राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खतांचे दर कमी करण्याबाबत केंद्राकडे मागणी केलीय. तर आता भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी देखील केंद्र सरकारला पत्र लिहून खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी करून बळीराजाला आधार देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांचेकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.
लॉकडाउनमुळे शेतमाल विक्री करताना आल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला यावर्षी खताचे भाव वाढल्याने दुष्काळात १३ वा महिना म्हणायची वेळ आलीय. यातच केंद्र सरकारने दर कमी करावेत, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात असताना खा. प्रीतम मुंडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रासायनिक आणि मिश्र खतांच्या किमंती करावेत अशी मागणी देखील पत्राद्वारे केली आहे.
खा. प्रीतम मुंडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक आणि मिश्र खतांच्या दरात केलेल्या अत्याधिक दरवाढीने राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. महामारीच्या संकटात अन्नदात्या बळीराजावर दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून तात्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे, केंद्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य दिल्यामुळे खतांच्या किंमती कमी करण्याबाबत सुद्धा सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असा विश्वास खा. मुंडे यांनी व्यक्त केला आहे.