बहुजननामा ऑनलाइन – मुंबई आणि पुण्याचे क्षेत्र वगळून कोरोना विषाणूचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागांत 20 एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. उद्योग सुरू करण्यासाठी कामगारांच्या सुरक्षित वाहतुकीची-राहण्याची व्यवस्था करण्याची अट उद्योजकांना घालण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाच्या हाहाकारामुळे 3 एपिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र, 20 एप्रिलपासून कोराना बाधित नसलेल्या भागात काही प्रमाणात अटी शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याबाबत उद्योगमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. परिस्थितीनुसार 21 तारखेच्या आसपास उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्योग विभागाच्या कृतिदलाने याबाबत तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल, असे देसाई यांनी सांगितले. रोजगार गमावलेल्या लोकांना उत्पादनाचे साधन मिळावे, हाताला रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्योग सुरू करण्यामागचा हेतू आहे. हे करताना शेतीआधारित उद्योगांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे शेतकर्यांना पुढील हंगामांसाठी मदत होईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
उद्योजकांना या अटींचे करावे लागणार पालन
* कामगारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करतील, अशा उद्योजकांना कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली जाईल.
* कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे उद्योग नियम पाळतील आणि वाहतुकीची व्यवस्था करतील त्यांनादेखील परवानगी मिळेल.
* एमआयडीसीमध्ये लघुउद्योगांनी एकत्र येऊन कामगारांची राहण्याची सोय केल्यास उद्योग विभाग त्यांना मदत करणार आहे.