बहुजननामा ऑनलाइन – देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात बाधितांपैकी बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा वेगाने पसरत असल्यामुळे आरोग्य विभागासह राज्य सरकार चिंतेत होते. मात्र, आता कोरोनाचे रुग्ण बरे होउन घरी जात असल्यामुळे अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे 265 रुग्ण बरे झाले आहेत.
बरे झालेल्या या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ठिकठिकाणी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला जात असून समाजातूनही या रुग्णांचे स्वागत केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकणार्यांमध्ये सहा महिन्याच्या चिमुकल्यापासून ते 83 वर्षांच्या आजीबाईंचा समावेश असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. कोरोनाला हरविणार्या सहा महिन्याच्या कल्याण येथील चिमुकल्याच्या आईशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्याचे अभिनंदनही केले.
कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर तीन हजारांवर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी सुमारे 60 ते 70 टक्के जणांना लक्षणे दिसत नसून 25 टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत तर पाच टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे. 9 मार्चला राज्यातील पहिले दोन कोरोना रुग्ण आढळून आले. पुण्यातील दाम्पत्य असलेले हे रुग्ण 14 दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर 23 मार्चला बरे होऊन घरी गेले. राज्यातील पहिले कोरोनामुक्त रुग्ण म्हणूनही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणार्यांची संख्याही वाढत आहे. बरे होणार्या रुग्णांचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.