नवी दिल्ली : वृत्तसंस्था- जम्मू काश्मीरबाबत चीन आणि पाकिस्तानच्या वक्तव्याचं भारताने खंडन केलं आहे. भारताने पुन्हा एकदा सांगितले आहे की, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याआधी रविवारी काश्मीर मुद्द्यावर चीन आणि पाकिस्तानने परस्पर चर्चा केली आणि या क्षेत्रातील वादावर तोडगा काढण्याची गरज आहे यावर जोर दिला.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, “चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचा दौरा केल्यानंतर काश्मीरसंदर्भात चीन आणि पाकिस्तानने केलेलं संयुक्त विधान आम्ही नाकारतो. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. तथाकथित चीन-पाकिस्तानने सुरु केलेल्या आर्थिक कॉरीडॉर प्रकल्पांबाबत भारताने वारंवार चिंता व्यक्त केली आहे. कारण हे प्रकल्प भारतीय हद्दीत सुरु आहेत, ज्यावर पाकिस्तानने 1947 पासून अवैधपणे कब्जा करून ठेवला आहे.
चीनचे परराष्ट्रमंत्री म्हणाले होते की…
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या दोन दिवसीय पाकिस्तानी दौऱ्याच्या समारोपावर जारी केलेल्या संयुक्त विधानात दोन्ही देशांनी यावर जोर दिला होता की, कोणत्याही प्रादेशिक किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीत त्यांच्यातील सामरिक युती कायम राहिल. वांग यांनी पाकिस्तानी दौरा तेव्हा केला जेव्हा 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यांतर भारत आणि पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण होते.
दोन्ही देशांनी म्हटलं होतं की, शांतीपू्र्ण, स्थिर, सहयोगात्मक आणि समृ्द्ध दक्षिण आशिया यात सर्व देशांचे हित आहे. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायात स्पष्टपणे सांगितले होते की, कलम 370 हटवणं हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. सोबत पाकिस्तानने हे सत्य स्विकारावे असा सल्लाही दिला होता.