मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांसाठी खुषखबर आहे. राज्यातील सर्व सरपंचांचे मानधन वाढविण्यात आले आहे. तर उपसरपंचांनाही मानधन दिले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील २७ हजार ८५४ सरपंचांना तर तितक्याच उपसरपंचांना १ जूलै २०१९ पासून या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. तर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या निकषांनुसार मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांसाठी सरपंचाचे मानधन १ हजारऐवजी तीन हजार तर २००१ ते ८ हजार लोकसंख्या असलेल्या सरपंचांना १५०० ऐवजी ४ हजार आणि आठ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांच्या सरपंचांना दोन हजारांऐवजी ५ हजार मानधन करण्यात आले आहे. तर उपसरपंचांचेही मानधन अशाच प्रकारच्या निकषांनुसार एक हजार, पंधराशे, २ हजार रुपये असेल.
राज्य सरकारने मंगळवारी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यासोबतच एसटीच्या सर्व योजना धनगर समाजाला लागू असतील. राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या परिरक्षेचे धोरण मंजूर करण्यात आले आहे. त्यासोबतच दगड या गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या दरवाढीपैकी स्थगित केलेल्या दरवाढीच्या रकमेसंदर्भात निर्णय घेण्यात आला.