नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले. त्यामुळे आता तिहेरी तलाकसंदर्भात कायदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिहेरी तलाक विधेयकावरील मतदानाच्यावेळी अनेक विरोधी पक्षनेते गैरहजर होते. यावरून एमआयआमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुस्लिमांचे हितचिंतक काल कोठे होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
AIMIM MP, Asaduddin Owaisi on #TripleTalaqBill: It is unconstitutional. I hope the All India Muslim Personal Law Board will challenge it in the Supreme Court. pic.twitter.com/Gg5IGKAGbt
— ANI (@ANI) July 31, 2019
राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकाबाबत विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली त्यावर संतापून ओवेसी यांनी सडकून टीका केली आहे. ओवेसी म्हणाले की, “समाजवादी पार्टी, बसपा आणि इतर मोठमोठे पक्ष स्वत:ला मुस्लिमांचे हितचिंतक म्हणवतात. परंतु हे पक्ष काल कुठे होते ?” असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला आहे. याशिवाय, “या पक्षांनी काल ते कुठे होते याचे उत्तर दिले पाहिजे. काल मतदानावेळी या विरोधी पक्षांचे खासदार कुठे होते.” असेही ओवेसी म्हणाले. इतकेच नाही तर, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवाले या निर्णयाचा विरोध करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसच्या काही नेत्यांनी असा दावा केला होता की, तिहेरी तलाक विधेयकाबाबत राज्यसभेत होणाऱ्या मतदानापूर्वी व्हिप जारी करण्यासाठी खासदारांना पुरेसा वेळ मिळाला नाही. यावरून ओवेसी यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. ते म्हणाले की, “व्हिप जारी करण्यासाठी नेमका किती वेळ लागतो ? तरीही हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र गुलाम नबी आझाद असे सांगत असतील तर हे मात्र धक्कादायक आहे. आता तर कॉलवरूनही व्हिप जारी केला जाऊ शकतो.” असेही ओवेसी यांनी म्हटले.