नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन – धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना लागु करण्याच्या निर्णयाला आदिवासी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. लोकसभा निवडणूक डोळ्या समोर ठेवून धनगर समाजाच्या मतपेढीचा राजकीय लाभ मिळवण्यासाठी आदिवासी समाजाची केलेली ही क्रूर चेष्टा असून निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदिवासी संघटनांनी दिला आहे.
मुख्यमंत्री विविध जातींना अगदी खिरापत वाटल्यासारखे आरक्षण आणि सवलती देत आहेत. कुठलाही अहवाल, कोणतीही प्रक्रिया न करता निवडणुकीच्या तोंडावर या घोषणा होत आहेत. आता आदिवासींच्या सवलती धनगरांना देण्याचा निर्णय घेत सरकारने आदिवासींवर अन्याय केला आहे, असे आदिवासी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.लवकरच आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून सर्व संघटना आणि आदिवासी साहित्यिकांची बैठक घेऊन आंदोलनाचे व्यापक स्वरुप जाहीर केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांच्यासह आदिवासी महासंघ, आदिवासी हक्क संरक्षण समिती, आदिवासी बचाव आंदोलन, आदिवासी एकता परिषद अशा विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.