परभणी : बहुजननामा ऑनलाईन – लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी प्रत्येकास एकच मताचा हक्क दिला असून आपल्याच मतावर राज्य करणारे राजकर्ते आपल्यालाच भावनिक करून मतदान घेतात. नागरिकांनी आपल्या मताचा अधिकार विकासात्मक बाबीस प्राधान्य देऊन केला पाहिजे. भावनिक होऊन मतदान करू नये,असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी केले.
गंगाखेड येथे आंबेडकर चौकात २८ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर न.प.च्या महिला व बांधकाम सभापती विमल घोबाळे, संगीता जामगे, पौर्णिमा फुलवरे, शिवकन्या साळवे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य मतदाराला चाणक्यनितीने फसविले जात आहे. सर्वसामान्यांच्या घरी नाही तर राजा हा राजाच्या घरीच निर्माण होत असून घराणेशाहीचा ऊत आला आहे. घराणेशाही हटविण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या मताच्या अधिकारानुसार सर्व सामान्यांनाही राजा होण्याची संधी दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.