पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी, असा सर्वांनुमते ठराव माढ्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात संमत करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत स्वाभिमानीने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली आहे. मात्र, हातकणंगलेची जागा वगळता अन्य जागा देण्यास आघाडीची तयारी नाही. त्यामुळे आघाडीच्या विरोधात दबावतंत्राचा भाग म्हणून माढा लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याविरोधात राजू शेट्टींना उतरविण्याची जय्यत तयारी स्वाभीमानीकडून करण्यात येऊ लागली आहे.
लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून पवारांविरोधात राजू शेट्टींनी निवडणूक लढवावी, असा ठराव सोलापुरातील वेळापूरमध्ये झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघ मेळाव्यात करण्यात आला. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली माढा लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. गेल्या वेळी सदाभाऊ खोत यांनी या मतदारसंघातून ‘स्वाभिमानी’कडून लढताना जवळपास साडेचार लाख मते मिळवली होती. या मतदारसंघात स्वाभिमानीचे चांगले नेटवर्क असल्याने माढा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक पक्षाकडून लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून होत आहे.
यंदा हातकणंगलेसोबत राजू शेट्टींनी माढ्यातूनही उमेदवारी करावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह या मेळाव्यात दिसून आला. एका बाजूने रविकांत तुपकर हे शरद पवार यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा करत असून स्वाभिमानीने बुलडाणा आणि वर्धा या दोन मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. अजूनही कॉंग्रेस आघाडीकडून कोणतेही सकारात्मक उत्तर येत नसताना माढ्यासाठी स्वाभिमानीने केलेला ठराव शरद पवार आणि कॉंग्रेस आघाडीसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे .