पुणे : बहुजननामा ऑनलाईन – दिघी परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाजाचे प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी आदिवासी बांधवांची एकता परिषद घेण्यात आली. त्यास समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये आदिवासी एकता परिषदेची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगसेवक लक्ष्मण उंडे होते. माजी नगरसेविका आशा सुपे, सामाजिक कार्यकर्ते बाळू लांडे, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक व आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष नामदेव लढे, उपाध्यक्ष निवृत्ती लांडे, दत्तात्रय ढेंगळे, सचिव दिगंबर घोडे, सहसचिव बबन पारधी, सहखजिनदार सीताबाई किरवे, ऍड किरण गभाले, वसंत आप्पा रेंगडे, ज्ञानेश्वर मुऱ्हे, संजय बांबळे, जगन दुधाने, पांडुरंग करवंदे, शांताराम दिघे, उल्हास नांगरे आदी उपस्थित होते.
बाळासाहेब लांडे म्हणाले की, या परिषदेत महिलांना स्थान देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनेने प्रयत्न करावेत. या भागात आदिवासी समाज भवन बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष नामदेव रडे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली. नगरसेवक लक्ष्मण उंडे यांनी समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.