बहुजननामा ऑनलाईन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आता स्वतःचच घर खायला उठल्यासारखे झाले आहे. पाकिस्तानातील वाईट आर्थिक परिस्थिती आणि काश्मीर प्रश्नावर भारताविरोधात वक्तव्यामुळे तेथील जनतेने त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. संसदेनंतर आता पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात सामान्य लोक इम्रान खानचा निषेध करत आहेत आणि गो बॅकच्या घोषणा देत आहेत.
वास्तविक काश्मीरच्या समर्थनार्थ शुक्रवारी मुझफ्फराबाद येथे इम्रान खानचा जलसा आयोजित करण्यापूर्वी मोठ्या जमावाने ‘गो नियाजी गो बॅक’ चा नारा लगावला. नियाझी हे इम्रान खानचे टोपणनाव आहे.
इम्रानच्या नावाशी जोडलेले नियाझी आडनाव पाकिस्तानच्या लोकांना १९७१ च्या युद्धात भारताकडून मिळालेल्या लज्जास्पद पराभवाची आठवण करून देतो. पाकिस्तानी लष्कराचे तत्कालीन कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाझी यांनी १६ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्य कमांडर लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरासमोर शस्त्रे ठेवली. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात राहणारे नियाजी पख्तून आहेत. पाकिस्तानात ते बहुतेक मियावाली येथे राहतात. तरी आमिर अब्दुल्ला नियाझी आणि इम्रान खान नियाझी दोघांचा जन्म लाहोरमध्ये झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी जलसामध्ये कोणतीही लक्षणीय गर्दी नव्हती, त्यात सामान्य लोक या कार्यक्रमापासून दूर राहिले. तेथील जागा भरण्यासाठी प्रशासनाने सरकारी अधिकाऱ्यांना आणले. त्यामुळे काही लोकांनी या जलसाला फ्लॉप शो म्हटले आहे. गुरुवारीसुद्धा जेव्हा राष्ट्रपती आरिफ अल्वी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करत होते, तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इमरानवर निशाणा साधत ‘गो नियाझी गो’ अशी आरडा-ओरड सुरू केली.