मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं. शिवसेना-भाजपा यांच्यातील युती तुटून राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग करण्यात आला आहे. मागील काही दिवस सुरु असलेल्या या नाट्यावर सत्तांतराने अंतिम पडदा पडल्यानंतर मनसे सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षासाठी पक्षाला मतदान करावं असं आवाहन केलं होतं. मात्र युती आणि आघाडीच्या तुलनेत स्बबळावर लढणाऱ्या मनसेला राज्यात केवळ १ जागा जिंकता आली. मनसेने या निवडणुकीत १०० च्या आसपास उमेदवार उभे केले होते. त्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील आमदार म्हणून निवडून आले. राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी घरोबा करत सत्तास्थापन केली आहे.
तर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. मनसेच्या या बैठकीला पक्षाचे सर्व सरचिटणीस,उपाध्यक्ष उपस्थित राहणार असून सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढील वाटचालीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
Visit : bahujannama.com