बहुजननामा ऑनलाइन टीम – महाविकास आघाडी सरकारने ‘टीआरपी’ (TRP) घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते. नुकतीच प्रसिद्ध झालेली सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मत व्यक्त केले आहे. टीआरपी घोटाळयानंतर एका तथाकथित पत्रकाराचे संभाषण समोर आल्यानंतर पाटील यांनी ट्वीट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानला जातो. मात्र प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय व प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते. अनेक गोपनीय बातम्या देशाच्या संसदेला आणि अगदी देशाच्या मंत्रीमंडळाला अवगत होण्यापूर्वीच या व्यक्तीला माहिती होत्या.
सदर व्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक ‘विजयाचा’ क्षण वाटतो आहे. प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल. हा इसम अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे, न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे असा आरोपही पाटील यांनी केला आहे.