लंडन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग भयभीत झाले आहे. जगातील तब्बल 180 देशांमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोट्यावधी लोक या विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्राणघातक विषाणूचा खात्मा करण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे संशोधक लस शोधण्याच्या कामात व्यस्त आहेत. काही महिन्यात कोरोना विरुद्धची लस उपलब्ध होईल. तसेच हा व्हायरस दोन वर्षात नष्ट होईल असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
जगावर कोरोनाचं महाभयंकर संकट असले तरी ते येत्या काळात निघून जाईल. मात्र जगातल्या पर्यावरण शास्त्रज्ञांनी आणखी मोठा इशारा दिला आहे. कोरोनापेक्षाही वातावरणात होणारा बदल हे जगावरचं मोठं संकट आहे, त्याचबरोबर ते जास्त घातक असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. कोरोना विषाणूमुळे झालेले नुकसान कालांतराने भरून येईल. मात्र, वातावरणातल्या बदलामुळे जे अनिष्ट परिणाम होत आहेत ते सगळ्या पृथ्विसाठीच घातक आहे. मानवाच्या अस्तित्वाला त्यामुळे धोका असल्याचा इशारा जगभरातल्या अभ्यासक आणि तज्ज्ञांनी दिला आहे.
पुढच्या तीन दशकांमध्ये पृथ्वीच्या तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे जे परिणाम होतील त्यामुळे प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे. अनेक छोटे देश समुद्रात गडप होतील, तर वातावरणाचं चक्रही बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागेल असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामध्ये हजारो लोकांचा बळी जाऊ शकतो. तर आर्थिक हानी किती होईल याचा अंदाजच सांगता येणार नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाचं संकट गेल्यावर याचा विचार केव्हा होणार असा सवालही त्यांनी केला आहे.