नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, मी दिल्लीसाठी दिवसरात्र काम केले आणि त्याबदल्यात भाजपावाले मला दहशतवादी म्हणत आहेत. मी 5 वर्ष तुमचा मुलगा बनून काम केले. हा निर्णय तुमच्यावर सोडतो की, मी तुमचा मुलगा आहे, भाऊ आहे की दहशतवादी आहे.
केजरीवाल म्हणाले, मधुमेहाचा रूग्ण असतानाही मी भ्रष्टाचाराविरूद्ध उपोषण केले. मला मधुमेह आहे. मी एका दिवसात चारवेळा इन्सुलिन घेतो. जर मुधमेहग्रस्त व्यक्ती इन्सुलिन घेत असेल आणि 3-4 तास त्याने काहीही घेतले नाही तर तो बेशुद्ध पडू शकतो. एवढेच नव्हे तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो. या आवस्थेतही मी भ्रष्टाचाराविरूद्ध दोन वेळा उपोषण केले. पहिले 15 दिवसांचे आणि दुसरे 10 दिवसांचे उपोषय होते.
भाजपा खासदार प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना दहशतवादी म्हटल्याच्या मीडियातील वृत्ताला ट्विट करत केजरीवाल यांनी लिहिले होते की, मी लोकांच्या कल्याणासाठी दिवस-रात्र काम करत आहे. पाच वर्षे रात्रंदिवस दिल्लीसाठी काम केले आहे.
लोकांसाठी सर्वकाही त्याग केला. राजकारणात आल्यानंतर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. लोकांचे जीवन चांगले होण्यासाठी या अडचणींना तोंड दिले. त्याच्या बदल्यात आज मला भाजपावाले दहशतवादी म्हणत आहेत…खुप दु:ख होत आहे.