मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – काही वेळा पूर्वीच १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ८ नोव्हेंबर रोजी १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र नवीन सरकार स्थापन करण्यासंदर्भात तिढा सुरु आहे. मुख्यमंत्री पदावरून भाजप – शिवसेनेत रस्स्सीखेच सुरु आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बहुमत नसल्याने भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करणे टाळत , सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेबरोबर कधीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
सत्तास्थापनेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेने कधीही तयारी दाखवली नाही, तसेच गेल्या अडीच -अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात कोणतेही बोलणे झालेले नाही. वरिष्ठांसोबत देखील यासंदर्भात कोणतेही बोलणे झाले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. अमित शहा यांनादेखील मी याबाबत विचारले कि, माझ्या समोर किंवा माझ्यामागे असा कोणता निर्णय किंवा चर्चा झाली आहे का ? यावर शहा यांनी देखील अशी कोणतीही चर्चा न झाल्याचे सांगितले. अशी माहिती मुख्यमंत्री यांनी माध्यमांना दिली.
दरम्यान, ‘जे ठरलं आहे ते द्या’ असे म्हणत शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसली आहे. मात्र भाजपने असे काहीही न ठरल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी आदरणीय आहेत, पक्षातील कोणत्याही सदस्याने त्यांच्याविरुद्ध वक्तव्य केले नाही, मात्र शिवसेनेकडून अनेकदा भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसोबत घेतलेल्या बैठकीत दिली. त्यामुळे सत्तास्थापनेसंदर्भात उद्याचा दिवस महत्वाचा ठरणार आहे.
Visit : bahujannama.com