बहुजननामा ऑनलाइन टीम – रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. तारीक पॅलेस दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे तर 8 जणांना वाचवण्यात यश आले आहे. जखमी रुग्णांवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही 18 ते 19 लोक दबले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर सरकारने दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.
या दुर्घटनेला 19 तास उलट्यानंतर चार वर्षाच्या मोहम्मद बांगीला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. मात्र, अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या घटनेची राज्य सरकारने दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.
रायगड ला अजुन निसर्ग वादळ ची पुर्ण नुकसान भरपाई मिळाली नाही..
आता कालच्या इमारतीच्या मदतीची घोषणा या सरकार नी केली आहे..
या विश्वासघाती सरकार वर कसा विश्वास ठेवायचा जनतेने ???— nitesh rane (@NiteshNRane) August 25, 2020
नितेश राणे यांनी ट्विट करत राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राणे यांनी सरकारवर विश्वास कसा ठेवणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण, निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या रायगडवीसीयांना अद्यापही पूर्ण नुकसान भरपाई मिळालेली नाही. आता, महाड इमारतीच्या मदतीची घोषणा या सरकारने केली आहे. पण, या विश्वासघाती सरकारवर कसा विश्वास ठेवायचा जनतेने ? असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.