अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत तीव्र दुष्काळामुळे शेतकरी वर्ग विविध संकटांचा सामना करीत आहेत.शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यांसह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी संभाजी ब्रिगेडने जिल्हा कचेरीसमोर घंटानाद करीत शासनाचे लक्ष वेधत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रूपये देण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी अंतर्गत कपात केलेली शेतकऱ्यांची २५ टक्के रक्कम परत देण्यात यावी, दिवसेंदिवस होणारी रासायनिक खताची भाववाढ कमी करण्यात यावी. खते, बी-बियाणे, कीटकनाशक कंपन्याचे राष्ट्रीयीकरण करावे तसेच शेती व्यवसायाला उद्योगाचा व संवैधानिक दर्जा देण्यात यावा, शेतीची कामे मनरेगा अंतर्गत समाविष्ट करावे, शेतकरीविरोधी कायदा रद्द करून भाव संरक्षण कायदा करण्यात यावा, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित व वेतन आयोगाचे धर्तीवर हमी भाव देण्यात यावा, कृषिपंप धारकांना विद्युत जोडणी तात्काळ देण्यात यावी व ती ऐच्छिक असावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
आंदोलनावेळी संभाजी ब्रिगेडचे डॉ. अभय गावंडे, जिल्हाध्यक्ष रणजित तिडके, संजय ठाकरे, अंकुश साठे, शरद काळे, कुशल देशमुख, हर्षदीप चावके, शुभम शेरकर, दीपक लोखंडे, अजित काळबांडे, गजानन मानकर आदी सहभागी होते.