बहुजननामा ऑनलाईन – काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याबाबत लोकसभेत चर्चा झाली. या लोकसभेतील चर्चेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० आणि कलम ३७१ मधील फरक सांगताना कलम ३७१ मध्ये कुठल्याही तरतुदी हटवण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही हे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कलम ३७० हे काश्मीरला विशेषअधिकार देणारे कलम हटवण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकार ३७१ सुद्धा हटवणार असा अपप्रचार सुरु केला होता. त्यावर उत्तर देताना अमित शहांनी ३७० आणि ३७१ मधील फरक स्पष्ट केला. तसेच ते म्हणाले महाराष्ट्र आणि पूर्वोत्तर भारतातील जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की कलम ३७१ हटवण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नाही. आणि कलम ३७० आणि कलम ३७१ मधील फरक जनता जाणते, असा टोलाही अमित शहा यांनी लगावला आहे.
“कलम ३७० बाबत पंडित नेहरू म्हणाले की, कलम ३७० हे अस्थायी स्वरूपाचे आहे. योग्य वेळ येताच ते समाप्त होईल. मात्र ती वेळ येता येता ७० वर्षे उलटून गेली. यावर उत्तर देताना शहा म्हणाले, पण आम्ही काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी ७० वर्षे लावणार नाही. ”
१९६० मधील संशोधनानुसार कलम ३७१ अन्वये १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांवर लागू करण्यात आले होते. त्यानुसार गुजरात या नव्या राज्याची निर्मिती करण्यात आली. त्याचबरोबर कच्छ आणि सौराष्ट्र ही राज्ये ही मुंबई प्रांतापासून वेगळी करण्यात आली तर विदर्भ आणि मराठवाडा हे विभाग महाराष्ट्रात विलीन करण्यात आले. तसेच मुंबई राज्याचे नामकरण महाराष्ट्र असे करण्यात आले.