पुणे : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 40 ते 60 कि.मी. ने वारे वाहत असून हवामान खात्याने सलग 3 दिवस राज्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उद्या (दि.5 ऑगस्ट) रोजी जिल्हयातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहिर केली आहे. दि. 4 ऑगस्ट ते दि. 6 ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता.
जिल्हयातील भोर, जुन्नर मावळ आणि वेल्हा तालुक्यांमध्ये कालपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली असल्याने पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उद्या (दि.5 ऑगस्ट) पुणे जिल्हयातील सर्व शाळांना सुट्टी जाहिर केली आहे. पानशेत आणि खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा मोठया प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. रविवारी सकाळी 11 वाजता जवळपास 35 हजार 574 क्युसे. पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसामुळे पुणे शहर आणि जिल्हयातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
पुणे जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये सोमवारी (दि. 5 ऑगस्ट) बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्याबाबतचा आदेश देखील काढला आहे. अतिवृष्टीचा परिणाम शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होवु नये म्हणून जिल्हाधिकार्यांनी हे आदेश काढले आहेत. उद्या जाहिर करण्यात आलेल्या सुट्टीबाबत सर्व शासकीय यंत्रणांना कळविण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिचवडच्या पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्तांचा समावेश आहे. सर्व तहसिलदारांना आणि पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांना देखील याबाबत कळविण्यात आले आहे.