नवी दिल्ली: वृत्तसंस्था – केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या काही खास योजना आहेत. ज्यामुळे वृद्धपकाळात तुम्हाला पैशाची चिंता करावी लागणार नाही. देशातील गरिब लोकांसाठी, शेतकरी आणि जेष्ठ नागरिकांसाठी मोदी सरकारने अनेक व्यवस्था केल्या आहेत, जेणेकरून त्यांना तणावमुक्त राहून आपले जीवन सहजपणे व्यतीत करता येईल. आज आम्ही तुम्हाला अशाच ४ सरकारी योजनांबद्धल सांगणार आहोत, ज्यात गुंतवणूक केल्यावर तुमची पैशांची चिंता राहणार नाही.
१. अटल पेंशन योजना
कोणताही भारतीय नागरिक अटल पेंशन योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेसाठी आपल्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच, APY अंतर्गत पेंशन मिळविण्यासाठी तुम्हाला किमान २० वर्षे गुंतवणूक करावी लागेल. पेंशन योजनेंतर्गत एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त ५००० रुपये मासिक पेंशन मिळू शकते. वयाच्या ६० व्या वर्षांपासून तुम्हाला APY अंतर्गत पेंशन मिळू शकेल.
२. PM श्रमयोगी मानधन योजना
ही पेंशन योजना सरकारने २०१९ मध्ये चालू केली. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना शासनाकडून पेंशन दिली जाते. या योजनेंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर ३००० रुपये पेंशन दरमहा देण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला वर्षाकाठी ३६ हजार रुपये मिळतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या योजनेतून आतापर्यंत सुमारे ४३.७ लाख लोक जोडले गेले आहेत.
३. PM किसान मानधन योजना
PM किसान मानधन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पेंशन देण्यात येते. PM किसान मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वयोगटातील कोणताही शेतकरी भाग घेऊ शकेल. वयाच्या ६० व्या वर्षानंतर या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये किंवा ३६ हजार रुपये वार्षिक पेंशन मिळेल. आतापर्यंत सुमारे २० लाख शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत.
४. PM लघु व्यवसाय मानधन योजना
PM नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये सप्टेंबर २०१९ मध्ये ही योजना सुरु केली. ही मुख्यतः छोट्या व्यावसायिकांसाठी निवृत्तीवेतन योजना आहे. छोट्या व्यावसायिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा हा उपक्रम आहे, याअंतर्गत ६० वर्षांच्या वयानंतर त्यांना मासिक ३००० रुपये पेंशन मिळेल.
पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन नोंदणी करू शकता. सरकार पेंशन योजनेतही तितकेच योगदान देईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आणि बँक खात्याखेरीज इतर कागदपत्रांची गरज भासणार नाही.