मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. राज्यात लवकरच दोन हजार तलाठ्यांची भरती सुरू होणार आहे. या तलाठी भरतीच्या फाईलला अंतिम मंजुरी मिळाली असून, आठवडाभरात याबाबतची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
नाविन्यपूर्ण बदल –
मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , तलाठी पदभरतीची प्रक्रिया या वेळी जिल्हा निवड समितीमार्फत राबविण्यात येणार नाही.हि भरतीप्रक्रिया ‘महापरीक्षा-ऑनलाइन’ या सरकारच्या अधिकृत यंत्रणेवर सोपवण्यात आलेली आहे. त्यासोबत मराठा आरक्षणाचा १६ टक्के कोटादेखील असेल.
परीक्षेचे स्वरूप –
तलाठी पदासाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. ही परीक्षा २०० गुणांची असून, १०० प्रश्न असतील. यासाठी मराठी, इंग्रजी, अंकगणित व सामान्यज्ञान या विषयावर प्रश्न असतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पदांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवाराला कोणत्याही एकाच जिल्ह्याचा प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. ज्या जिल्ह्याचा प्राधान्यक्रम दिला आहे त्याच जिल्ह्यात गुणवत्ता यादीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल. या परीक्षेची सर्व जबाबदारी ‘महापरीक्षा-ऑनलाइन’ या सरकारच्या अधिकृत यंत्रणेवर सोपवण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावा लागणार असून, परीक्षादेखील ऑनलाइनच होणार आहे.राज्यात ऐन निवडणुकीच्या काळात महाभरतीची प्रक्रिया सुरू होत असल्याने सरकारवर बेरोजगारांची असलेली नाराजी कमी होण्यास मदत होईल, असे मानले जात आहे.