नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दडपशाहीचे धोरण सुरु असून ते सीबीआय, ईडी व पोलीस अशा तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना गप्प करण्यासाठी करीत आहेत. त्यांनी वर्धा येथील प्रचार सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार कारागृहाची भीती दाखविणे, हा असाच दमबाजीचाच प्रकार आहे. मात्र, मोदी- शहा यांचेही गोध्रा प्रकरण ‘रिओपन’ होऊ शकते, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी केला.
भुजबळ म्हणाले, सीबीआय, ईडी अशा तपास यंत्रणांचा वापर विरोधक व प्रसार माध्यमांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. देशात सगळीकडेच दिग्गज लोकांना धमकावणे तसेच प्रसार माध्यमांच्या विरोधात या यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. गुजरातमधील २००२ च्या गोध्रा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात केसेस आहेत तसेच न्यायाधीश लोया प्रकरणही ताजे आहे. अशी प्रकरणे रिओपन होऊ शकतात.
महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सर्वात शक्तिशाली नेते आहेत हे मोदी ,शहां यांनीही मान्य केले आहे. म्हणूनच त्यांना सरकारकडून टार्गेट केले जात आहे. मात्र मोदी शेतकरी आत्महत्या, नोटाबंदी, दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख हे मुद्दे सोडून दुसऱ्याच्या घरात काय सुरू आहे, हे बघण्यातच धन्यता मानत असल्याची टीकाही भुजबळ यांनी केली .
लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसने जाहीरनामाजाहीर केला आहे त्यामध्ये गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अभ्यास केल्यानंतरच या मुद्याचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यास या आश्वासनाची पूर्तता होईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.