मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून दिल्लीच्या धर्तीवर राज्यातील सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. राज्य सरकार सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा विचार करत आहे. याबाबत लवकरच धोरण आणण्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानपरिषदेत केली आहे.
तसेच त्यांनी घरगुती वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज देण्याची एक समिती अभ्यास करत असून तिचा अहवाल तीन महिन्यात प्राप्त झाल्यावर याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही नितीन राऊत यांनी सांगितले. राज्यात वीजदर कमी होण्यासाठी यासंदर्भात अभ्यास करून हे नवीन वीज धोरण राज्यात आणले जाणार आहे. तसेच त्यात १०० युनिटपर्यंत मोफत देणे आणि शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी चार तास वीज देणे प्रस्तावित असल्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितले.
https://twitter.com/NitinRaut_INC/status/1234903304536313857
महाराष्ट्रात देशातील सर्वात महाग वीज असल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी एमआयडीसी खासगी कंपनीकडून वीज घेण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत एमएसईबी काय करणार, असा प्रश्न काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केला. त्याला उत्तर देताना सरकार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संचलन आणि सुव्यवस्थेतील खर्च मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले.