हिंगोली : बहुजननामा ऑनलाइन- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावातील शेतक-यांनी एकत्र येत चक्क एक मोठा आणि राज्याला हादरवून टाकणारा निर्णय घेतला आहे. आपले स्वताचेच गाव विक्रीला काढत त्यासाठीचे रितसर निवेदन ही त्यांनी तहसीलदार कार्यालयात दिले आहे. या गावाची लोकसंख्या आहे चार हजार, येथे सुमारे 1000 शेतकरी आहेत. त्यांनी बुधरुवारी ग्रामसभा घेतली आणि हा निर्णय घेतला. गुरुवारी तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले.
येथे भीषण दुष्काळ आहे. मागील वर्षी येथे काढण्यात आलेल्या पीकविम्याचे पैशे शेतक-यांना अध्यापही मिळालेले नाहीत. सेनगाव तालुक्यातील आजेगाव मंडलामधील या गावातील केवळ पस्तीस शेतक-यांनाच पीकविम्याचे पैसे मिळाले आहेत. त्यामुळे इतर शेतक-यांवर अन्याय झाला आहे. येथे मोठा दुष्काळ पडला आहे. शेती पीकवता येत नाही. त्यामुळे हे गाव विक्री झाल्यावर येथील लोकांना हिंगोली येथील एमआयडीसी मध्ये नोक-या द्याव्यात, पीकविमा तातडीने द्यावा, शेतक-यांचे सरसकट कर्ज माफ करावे, अशा मागण्या या निवेदनामध्ये आहेत. शुक्रवारपासून शाळा व ग्रामपंचायत बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.