बहुजननामा ऑनलाईन – भारतात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत देशात २६ लाख ४७ हजार ३१६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५१ हजार ४५ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अशातच देशाच्या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमा ‘गगनयान’ आणि ‘चांद्रयान-३’ ला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘गगनयान’ मोहिमेची मानवरहित चाचणी, २५ नवीन प्रक्षेपणे, तामिळनाडूत प्रक्षेपण केंद्र आणि ‘चांद्रयान-३’ अशा मोहिमांची घोषणा करुन भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) २०२० मधील आपल्या योजना केल्या असून, तो भारतीय अवकाश कार्यक्रमांना पुढे नेणाऱ्या होत्या. अवकाश संशोधनाच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आपली मुद्रा उमटवणाऱ्या ‘इस्रो’च्या या मोहीम केवळ भारतसाठीच नव्हे तर एकूणच विश्वाच्या आकलनासाठी महत्वाच्या मानल्या जातात.
चांद्रयानाची पहिली मोहीम फत्ते करुन चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर दुसरी मोहीम राबविली गेली. त्यामधील विक्रम लँडरला चांद्रभूमीवर अलगद उतरविण्यात यश आले नसले, तरी त्या मोहिमेची अन्य उद्दिष्टे यशस्वी झाली. त्यात मोहिमेतील ऑर्बिटर चंद्राभोवती भ्रमण करीत आहेत. ‘चांद्रयान-३’ ला मंजुरी देऊन केंद्र सरकारने ‘इस्रो’च्या चंद्राविषयीच्या मोहिमांना पाठबळच दिले आहे. या तिसऱ्या मोहिमेसाठी ६१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरविण्यावर भर असेल. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राबद्दलचा अधिकची माहिती मिळेल. पण त्याला उशीर होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. ‘इस्रो’ ने त्याबाबतची माहिती दिली असं सूत्रांनी सांगितलं.
तसेच देशाच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्ष पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने ३ अंतराळवीरांच्या टीमला ५ ते ७ दिवसांसाठी अंतराळात पाठविण्याची भारताची योजना होती. पंतप्रधान मोदींनी त्यांची घोषणा केलेली. दरम्यान, कोरोनाचे संकट सर्व जगावर असल्याने त्यांचा परिणाम इस्रोच्या कामावर सुद्धा झाला असून, त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा थोडा जास्त काळ जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.