बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन महिने बंद ठेवण्यात आलेली विमानसेवा आजपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एआरपोर्टवरून पहाटे 4 वाजून 45 मिनिटांला पुण्याकडे पहिल्या विमानाने उड्डाणा केले. बंगाल आणि आंध्र सोडून सर्व ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे.
नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने प्रवासी आणि एअरलाइन्सबाबत काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र आणि तमिळनाडू राज्य सरकारने देशातंर्गत विमानसेवा सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर हरकत नोंदवली आहे. विमानसेवेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्याशी चर्चा केली. आंतरराष्ट्रीय प्रवासात अडकलेले प्रवासी, वैद्यकीय आणीबाणी, विद्यार्थी आणि इतर अत्यावश्यक सेवेसाठीच विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्र सरकारने मुंबई विमानतळावरून 25 विमानांच्या टेकऑफला आणि लॅण्डिंगला परवानगी दिली आहे. हळूहळू ही संख्या वाढवली जाईल, अशी माहिती मंत्री नबाव मलिक यांनी दिली आहे. विमानाने प्रवास करणार्या 14 वर्षांपुढील प्रवाशांसाठी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे. याचसोबत तब्येतीच्या समस्या असणार्या 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे आणि गरोदर महिलांच्या प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा आणि जम्मू-काश्मीर अशा काही राज्यांनी प्रवाशांच्या क्वारंटाईनबाबत काही वेगळी नियमावली तयार केली आहे. काही राज्यांनी प्रवाशांना संस्थागत क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही प्रवाशांनी होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.