नांदेड : बहुजनामा ऑनलाइन – जातीय व्यवस्थेसोबत समाजव्यवस्थेतील अनिष्ट, चालीरीतींना छेद देत, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांनी जो समस्त महिलांच्या उत्थानासाठी संघर्ष केला, तो कुठल्याही जातीपुरता मर्यादित नव्हता. त्यामुळे या महानायिकांना जातीपुरते मर्यादित करून त्यांच्या कार्याची महतीही कमी लेखू नका, असे आवाहन प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनी केले.
हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे घेण्यात आलेल्या सार्वजनिक जिजाऊ, सावित्री व रमाई जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राम शिरफुले होते. प्रा. डॉ. काळबांडे म्हणाले, जिजाऊंनी शिवबा घडविताना तत्कालीन समाजव्यवस्थेच्या अनिष्ट चालीरीतींना छेद देत स्वराज निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली, सावित्रीबाई फुलेंनी जोतिबांच्या खांद्याला खांदा लावून तिच्या स्वातंत्र्याचा पाया रचला.
त्याचबरोबर रमाबाई आंबेडकरांनी स्वंत:च्या संसाराबरोबर देश कल्याणासाठी लढणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साथ देन्याचे प्रेरक कार्य केले. अशा या महानायिका केवळ समस्त महिलांचेच नव्हे तर समग्र मानव जातीचे प्रेरक स्रोत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी जि. प. सभापती जोगेंद्र नरवाडे, प्रा. संतोष मुडे, बाळासाहेब ओझलवार, प्रशांत भागवत, दत्ता काळे, सत्यजित नरवाडे, रामदास देवराय, वैभव नरवाडे, विजय नरवाडे, अशोक शिरपुले, बाबासाहेब नरवाडे, संतोष शिरफुले, व्यंकटेश फिसके, हाफीश शेख, दिलीप भवरे, शे. बाबु, गणपत धुमाळे आदी उपस्थित होते.