मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील काही भागात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपातील वाढ करण्यात आली असून, ही रक्कम दुष्काळग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ३४९ फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना योजना लागू होणार आहे. पण, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती असली तरी ती दोन हेक्टर म्हणजे पाच एकरपेक्षा अधिक आहे. सध्या या भागात तीव्र दुष्काळ आहे. त्यामुळे दोन हेक्टरची मर्यादा वाढवण्याची किंवा ती काढून टाकण्याची तसंच रक्कम वाढवण्याची मागणी या भागांतील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजाराची मदत केली जाणार आहे. तिन हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. पहिल्या हफ्त्याकरता आधारकार्ड अनिवार्य नसून त्यापुढे मात्र आधार कार्ड अनिवार्य आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेकरता 72 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा 12 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे