सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यभरातील सुमारे ५ हजार वडार समाजबांधवांना त्यांच्या हक्कांची घरे मिळवून देण्यात येणार आहेत. ज्यांची घरे शासकीय जमिनीवर बांधली गेली आहेत, त्यांची घरे त्यांना त्यांच्या नावावर करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर याद्या तयार करण्यात आल्या असून, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती वडार समाजाचे राज्य समन्वयक विजय चौगुले यांनी दिली.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, शंकर चौगुले आदींची उपस्थित होती. ही घरे शासकीय जागेवर अतिक्रमन असल्याने ही घरे नावावर होण्यास अडचण येत होती, पण शासनाने ही जागाच संबंधित व्यक्तींचा नावे करण्याचा निर्णय घेतलं आहे. याबाबत संघटनेच्या वतीने जिल्हानिहाय याद्या तयार केल्या असून . यावर शासनाकडून मंजुरी घेऊन पहिल्या टप्प्यात ५ हजार नागरिकांना हक्काचे घर देण्याचा प्रयत्न आहे. नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी वडार समाजाच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचे आर्थिक मदत जाहीर केली आहे.