सांगली : बहुजननामा ऑनलाईन – भाजपने पदवीधर मतदारसंघाच्या जागा जिंकण्याचं तंत्र काँग्रेसची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही आत्मसात केलं होतं. आता भाजपची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आली असताना नेमकं काँग्रेससारखं भाजपचं झालंय. असं का व्हावं? कुठं तंत्र चुकलं? याचं आत्मचिंतन भाजप करेल?, मग, चंद्रकांतदादांचं नेमकं कुठं चुकलं?, असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत.
2014 मध्ये राज्यात भाजपची सत्ता आली अन् चंद्रकांत पाटील यांचे भाग्य उजळले. त्यानंतर पक्षातील ते महत्त्वाचे शक्ती केंद्र बनले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी मेगा भरती करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्के दिले. मात्र, सांगली जिल्ह्यात भाजपच्या वाढीची कारणे वेगळीच आहेत, ती दादांच्या लक्षात आली नसावीत का?.
मागील 20 वर्षात राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्या छुपा पाठिंब्याने भाजप विस्तारला, हे नाकारता येणार नाही, होय ना?. पण, पालिका आणि जिल्हा परिषदेला भाजपने दोन्ही काँग्रेस विरुध्द लढूनही या दोन महत्त्वाच्या सत्ता येथे हाती घेतल्यानंतर दादांचा वारू सुसाट सुटला. त्यांनी अगोदर जयंतरावांना आणि नंतर शरद पवार यांना डिवचताना राष्ट्रवादीची छुपी रसदच तोडून टाकली.
पवारांच्या राजकीय उंचीबद्दल किंवा जयंतरावांना विधानसभेलाच संपवले असते, अशी केलेली बडबड पाहता कोणीही ही विधाने सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीमध्ये परिपक्वपणाची मानणार नाही. बडबडीचा तो अंदाधुंद गोळीबार होता.
दुसरा मुद्दा, भाजप-संघ परिवार वर्षानुवर्षे या निवडणुकांसाठी अतिशय हुशारीने तयारी करात असे. पडद्याआड राहून हजारो स्वयंसेवक ही कामगिरी पार पाडायचे. नेमके हेच अरुण लाड यांनी मागील 3 वर्षांत केले. अगदी कोरोना काळातही त्यांची नोंदणी मोहीम सुरूच होती. अगदी शेवटच्या 3 दिवसांत भाजपने पुण्यात 30 हजारांची नोंदणी केल्याने जयंतराव पाटील अस्वस्थ झाले होते. मात्र, हे ससा कासवाच्या शर्यंतीसारखे झालंय.
भाजपच्या तंत्राने लाड यांनी भाजपचा पराभव केलाय. मध्यंतरी तर या निवडणुका पुढे ढकलायला हव्यात, असेही विधान चंद्रकांतदादांनी केले होते. त्यावेळी ते तयारीत मागे पडल्याचे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे ऐनवेळी संग्राम देशमुख यांना घोड्यावर बसवावे लागले, हा संघ परिवारासाठी धक्काच होता. मराठाच उमेदवार हवा. तो आर्थिकदृष्ट्या मजबूत हवा, हे निकष पक्षनेतृत्वाने लावले, असेच समजते.
या गदारोळात चंद्रकांत तपभरापूर्वीची आपली आर्थिक ताकद विसरलेत असे समजते. या मतदारसंघातून पूर्वी ब्राह्मण उमेदवार निवडल्याचे देखील ते विसरले असावेत. त्याचे पडसाद संघ शिस्त मोडून सोशल मीडियावरून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियामधून दिसून आलंय. घराणेशाही, साखर सम्राट असे मुद्दे मांडणार्या भाजपचे हे वर्तन म्हणजे भाजप काँग्रेसमय झाल्याचेच उदाहरण आहे.
भाजपने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता पाय रोवले असताना हा पराभव कसा झाला? असा हा प्रश्नही आता उपस्थित होतोय. मात्र, इथे सत्तेचा नव्हे तर निवडणूक तंत्राचा खरा उपयोग असतो हेच भाजप विसरलंय.
भाजप-संघ परिवाराची ही रणनीती गेल्यावेळी सारंग पाटील यांनी पूर्ण हेरली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. त्यावेळी लाड यांची बंडखोरी नसती तर चंद्रकांतदादा दिसलेच नसते, असं शरद पवार एका कार्यक्रमात म्हणाले होते. पण, मागचा निसटता विजय असूनही राज्य सांभाळायला निघालेले चंद्रकांतदादा आपले घर सांभाळायचेच विसरले आहेत, असेच समजतंय.
गेल्यावेळी मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला होता. मात्र, ते अपघाताने झाले होते. यावेळी अशी मतविभागणी जाणीवपूर्वक करण्यावर भाजपचा भर राहिला. मात्र, लाड यांची तयारी एवढी होती की हे तंत्रही फारसे टिकलेच नाही.
देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी देखील कमी पडले…
या निकालाचा महाराष्ट्र राज्यातील बदललेल्या राजकीय वातावरणाशी जोडता देखील येईल. पदवीधर आणि शिक्षकमध्ये भाजपचा सर्वात मोठा गड असलेला नागपूरही यावेळी ढासळले. एकटे चंद्रकांतदादाच नव्हे तर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हे सर्वच दिग्गजही कमी पडले आहेत, हे आता स्पष्ट झालंय.
भाजपला आत्मचिंतनाची गरज?
आता जशी भाजपची काँग्रेस झाली आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भाजपचे पदवधीर-शिक्षक मतदारसंघाचे तंत्र आत्मसात करत आहेत. हा बदल नोंदवावा. तिघे एकत्र लढले म्हणून पराभव झाला…किंवा एक जागा तरी मिळाली; शिवसेनेला काय मिळाले? असे विश्लेषण करण्यात भाजप नेतृत्वात अडकले तर, मात्र परतीचे दोर स्वतःच कापण्यासारखे ठरेल. भाजपवाल्यांना आत्मचिंतन करा, असे सांगण्याची आवश्यकता नसते. त्यांचा चिंतनावर भर असतो म्हणे, संघ शिस्तीत आहे…ते सुरू झालेही असेल म्हणा..!