सातारा : बहुजननामा ऑनलाइन – म्हसवड शहरात आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी धनगर समाजाच्या साहित्य संमेलनाची सुरुवात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीने करण्यात आली.
माणसह आटपाडी, सांगोला तालुक्यातून संमेलनाच्या ग्रंथदिंडी व शोभायात्रेसाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी वेगवेगळे देखावे, चित्ररथ, स्वच्छतारथ, पाणी आडवा… पाणी जिरवा, अहिल्याबाई होळकर यांचा जीवंत देखावा, गजीनृत्य, लेझीम यांच्या भरगच्च शोभायात्रेने ग्रंथदिंडीची रॅली शहराच्या मुख्य पेठेतून काढण्यात आली होती.
आज रविवारी या धनगर साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.तीन दिवस चालणाऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळा नंबर १ येथे उभारलेल्या शामियान्यात ध्वजपूजन श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे चेअरमन एन. शेषगिरीराव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्वागताध्यक्ष बाळासाहेब कर्णवर, संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले, डॉ. आर. एस. चोपडे, हनुमंतराव चवरे, महेश काळे, उत्तमराव खांडेकर, बाळासाहेब मदने, कृष्णा बुरुंगले, संभाजी सूळ, बाळासाहेब मासाळ, डॉ. मुरहरी केळे, अमरसिंह बारगळ, गणेश हाके, केशव काळे, दत्ता डांगे, समाजसेवक महानंदा पैलवान, नेहारिका खोदले, डॉ. वर्षा चोरे, उषा मारकड, महादेव सरतापे, आप्पासाहेब पुकळे, बाळासाहेब काळे आदी मान्यवर व हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजपूजन करण्यात आले.खुडूस येथील हालगी पथकाने या शोभायात्रेला रंगत आणली होती.
झरे येथील हायस्कूलने अहिल्या दरबार, म्हसवड ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा अहिल्येच्या विचाराची समाजाला गरज हा चित्ररथ सर्वात लक्षवेधी ठरला. विरळी येथील जानुबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंभरान मांडलं या गीतावर चित्ररथ केला होता. पेड हायस्कूलने बॅ. टी. के. शेंडगे यांच्या जीवनकार्यावर चित्ररथ तयार केला होता. पुळकोटी हायस्कूल यांनी स्वच्छ भारत यावर चित्ररथ केला होता. बेवणूर हायस्कूलने पर्यावरणावर चित्ररथ केला होता. धुळदेव वारकरी दिंडी सोहळा, तिसंगी हायस्कूलने ऐतिहासिक पात्रे हा नाविन्यपूर्ण देखावा सादर केला.
रेवणाळ हायस्कूलचा भारतातील कतृर्त्ववान महिला चित्ररथ, विरकरवाडी हायस्कूल मुलींचे गजीनृत्य, अंकले हायस्कूल मुलगी शिकली प्रगती झाली हा देखावा या शोभायात्रेत सादर केला. यानंतर सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या दोन्ही कार्यक्रमास म्हसवडकरांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली होती.