नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘आप’ आता यूपीतील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi chief minister Arvind Kejriwal) यांनी केली आहे. ‘आप’ च्या या निर्णयावर मात्र भाजपचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Uttar Pradesh Deputy Chief Minister K P Maurya) यांनी ट्विट करून जोरदार निशाणा साधला आहे. 2 कोटी लोकसंख्या असलेली दिल्ली सांभाळता येत नाही, तर दुसरीकडे 24 कोटी लोकसंख्या असलेल उत्तर प्रदेश सांभाळण्याच्या गोष्टी सुरू आहेत. ही गोष्ट करणारा पक्ष सुंदर स्वप्नच पाहत आहे, अशा शब्दांत मौर्य यांनी अरविंद केजरीवाल आणि “आप”ला सणसणीत टोला लगावला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी यासंदर्भात त्यांनी घोषणा केली. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. जनआंदोलनच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षांपूर्वी पार्टीची स्थापना केली होती. तीन वेळा दिल्लीत सरकार स्थापन करण्यास पार्टीला यश मिळाले. याशिवाय, पंजाबमध्ये आपल्या पार्टीने मुख्य विरोधी पक्षाचीही भूमिका बजावली आहे असे केजरीवाल यांनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये अनेक पक्षांचे सरकार आले आणि सर्वांनी आपले घर भरण्याचे काम केले. यातच, उत्तर प्रदेशातून बरेच लोक आले, त्यांनी असे सांगितले की, आम आदमी पार्टीने राज्यात विधानसभा निवडणुका लढवाव्यात, असे अरविंद केजरीवाल म्हणाले, तसेच, उत्तर प्रदेशातील लोकांना प्रत्येक कामासाठी दिल्लीत का यावे लागलं? कानपूरच्या मुलांना चांगल्या कॉलेजसाठी दिल्लीत का यावे लागते? भारतातील सर्वात मोठे राज्य सर्वात मोठे विकसित राज्य का होऊ शकले नाही? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
महिलांवरील अत्याचार थांबत का नाहीत?
उत्तर प्रदेशात सर्व पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. अशा परिस्थितीत तेथील जनता आता आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवेल. उत्तर प्रदेशात मोहल्ला क्लिनिक का तयार होत नाही? आपण चांगली कॉलेज का तयार करू शकत नाही? असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, भाजपावर निशाना साधत महिलांवर होणारे अत्याचार अखेर का थांबत नाहीत? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.
तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यास यश
आम आदमी पार्टीने दिल्ली शिवाय पंजाब, गोवा आणि हरयाणा विधानसभेच्या काही जागांवर निवडणूक लढविली आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार आहे, तर पंजाबमध्येही पार्टीला चांगले यश मिळाले आहे. चांगले शिक्षण, आरोग्य आणि मोफत वीज-पाण्याच्या फॉर्म्युल्यामुळे 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 पैकी 62 जागा जिंकून दिल्लीत तिसर्यांदा सरकार स्थापन करण्यात यश मिळविले