नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (वय 67) यांचे आज दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. गेली 40 वर्षे राजकारणाबरोबरच ज्येष्ठ वकिल, लेखक, आर्थिक विश्लेषक अशा विविध पातळीवर त्यांनी काम करताना आपला ठसा उमटविला. मोदी सरकार 1 मध्ये अर्थमंत्री राहिलेले अरुण जेटली यांनी आर्थिक स्तरावर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्याचा देशाच्या अर्थकारणावर दीर्घकालीन परिणाम झाला. मोदी सरकार 1 मध्ये त्यांना ‘संकटमोचक’ म्हणून संबोधले जात होते.
Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS pic.twitter.com/OTDwN7sM0w
— ANI (@ANI) August 24, 2019
दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष
अरुण जेटली यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 रोजी नवी दिल्ली येथे महाराज किशन जेटली आणि रेतन प्रभा यांच्या घरी झाला. त्यांचे वडिल वकील होते. 1973 मध्ये ते दिल्लीतील श्री राम कॉलेज आॅफ कॉमर्समधून पदवीधर झाले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी आपले विधी शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान, ते १९७४ मध्ये दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते. अरुण जेटली यांचा 24 मे 1982 रोजी संगीता यांच्याशी विवाह झाला. त्यांना रोहन आणि सोनाली असे पुत्र आहेत.
1991 मध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य
वकिली करणारे अरुण जेटली हे 1991 मध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य बनले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांच्यावर पक्षाने राष्ट्रीय प्रवक्ता ही जबाबदारी सोपविली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात 13 आॅक्टोंबर 1999 रोजी सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे निरगुंर्तवणुक खात्याचा कार्यभारही सोपविण्यात आला होता. जगभरातून देशात गुंतवणूक यावी, यासाठी प्रथमच नवे मंत्रालय बनवून त्याचा कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता. 23 जुलै 2000 रोजी त्यांच्याकडे विधी, न्याय आणि कंपनी मंत्रालयाची कॅबिनेट मंत्री म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडे वेगवेगळी खाती येत गेली व त्यांनी त्या खात्यांना आपल्यापरीने न्याय देण्याचा प्रयत्न केला.
Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS. pic.twitter.com/pmr4xiyqYV
— ANI (@ANI) August 24, 2019
अमृतसर येथून पराभव पण ‘अर्थमंत्री’
2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला पराभवाला सोमोरे जावे लागले. त्यानंतर जेटली यांच्याकडे महासचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. ते पुन्हा वकिलीकडे वळले. 3 जून 2009 मध्ये त्यांची राज्यसभेवर विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली. भाजपाच्या केंद्रीय निवड समितीचे सदस्यही बनले. 1980 मध्ये ते भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाले तरी 2014 पर्यंत त्यांनी कोणतीही थेट निवडणुक लढविली नव्हती. ते राज्यसभेत निवडून येत होते. 2014 मध्ये अमृतसरमधून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. देशभरात मोदी लाट असतानाही अमरिंदर सिंग यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभेत पराभव झाला तरी मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात कॉपोरेट मंत्रालय आणि सरंक्षणमंत्री म्हणून त्यांचा समावेश केला. त्यानंतर त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद सोपविण्यात आले. तेव्हा त्यांनी सप्टेंबर 2016 मध्ये बेकायदेशीर उत्पन्न घोषित करण्याची योजना जाहीर केली. भ्रष्टाचाराने काळा पैसा जमविणाऱ्यांना त्यांनी एक संधी दिली होती.
त्यानंतर भ्रष्टाचार, काळे धन, बनावट चलन आणि दहशतवादावर अंकुश लावण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे देशभर खळबळ निर्माण झाली. त्यातून देशभर उद्भविलेल्या आर्थिक परिस्थितीचा त्यांनी नेटाने मुकाबला केला. सर्वत्र नोटा बंदी अयशस्वी झाल्याचे सांगितले जात असताना त्याच्या चांगल्या बाजू सांगत त्यांनी समर्थपणे सरकारची बाजू भक्कमपणे मांडली.
Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS pic.twitter.com/OTDwN7sM0w
— ANI (@ANI) August 24, 2019
GST लागू करण्यासाठी मोठे प्रयत्न
देशभर पसरलेल्या गोंधळावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी दिवसरात्र प्रयत्न केले. त्यानंतर मोदी सरकारने घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे जीएसटी लागू करणे. देशभरात जीएसटी लागू करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यात येणाऱ्या अडचणींचा वेळोवेळी आढावा घेऊन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर घेऊन जीएसटी तील मतभेदांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून देशभरात त्यांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात सरकारला यश आले.
प्रकृती बिघडल्यानं 2019 ची लोकसभा न लढविण्याचा निर्णय
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळाच्या अखेरच्या काही महिन्यांमध्ये त्यांना प्रकृतीने साथ दिली नाही. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुक लढविली नाही. तसेच मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात आपला समावेश करु नये, अशी विनंती पंतप्रधान मोदी यांना केली होती.
त्यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात वकिली केली. भाजपाचे ते नेते असले तरी वकिली करताना त्यांचे पक्षकार हे सर्व पक्षातील होते. काँग्रेसचे माधवराव सिंधिया, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह जनता दलाचे शरद यादव यांची त्यांनी विविध न्यायालयात बाजू मांडली.
क्रिकेटमध्येही त्यांना रुची होती. बीसीसीआयचे ते उपाध्यक्ष राहिले आहेत. राजकारणाबरोबरच त्यांनी कायद्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.
भाजपाची राष्ट्रीय पातळीवर बाजू मांडण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच त्यांना 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी रुग्णालयात धाव घेऊन त्यांची विचारपूस केली होती़.
9 ऑगस्टला रुग्णालयात दाखल
प्रकृती अस्वस्थ असल्याने 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीच्या ‘एम्स’ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार चालु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी त्यांची तात्काळ भेट घेतली. उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील एम्समध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. भाजपाच्या इतर दिग्गज नेत्यांनी देखील त्यांची एम्समध्ये जाऊन भेट घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील अरूण जेटली यांना भेटण्यासाठी एम्स रूग्णालयात गेले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, राज्यमंत्री अश्विनी चोबे हेही उपस्थित होते. जेटलींची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.