मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दिल्ली निवडणुकीत ‘आप’चा विजय भाजपाला थांबवता आलेला नसून ‘आप’ने ७० जागांपैकी ६३ जागांवर आघाडी घेतली असून केजरीवाल हे परत एकदा मुख्यमंत्री होतील, असे चित्र दिसत आहे. पण मागील वर्षीपेक्षा कमी यश मिळाले असून भाजपाला ७ जागा मिळतील असे चित्र आहे. तसेच यावर शिवसेनेने प्रतिक्रिया देत भारतीय जनता पार्टीला दिल्लीतल्या लोकांनी नाकारलेलं आहे, असे म्हणत शिवसेनेचे अनिल परब यांनी टीका केली आहे.
तसेच सदा न् कदा आम्हीच राज्य करू. आमच्याशिवाय कोणीच राज्य करू शकत नाही. हा जो अहंकार असतो. तो लोकं कधी ना कधी तरी उतरवतात. ‘आप’ची सत्ता जी पाच वर्षं होती, ती दिल्लीतल्या लोकांनी मान्य केलेली आहे. भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारलेलं आहे, असेही अनिल परब म्हणाले आहेत. मोदींच्या देशद्रोहीबाबत विधानाचा संदर्भ देत त्यावर देशद्रोहाची व्याख्या काय हे सर्वात महत्त्वाचे असून ते लोकांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे. एका व्यक्तीने देशद्रोहाची व्याख्या करणे म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. लोकांनादेखील ती मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे ते लोकांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात जे सत्तापरिवर्तन झालेलं आहे, त्याचा परिणाम दिल्लीत दिसतो आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
देशाच्या राजकारणाला शिवसेनेने वळण दिले असून त्या वळणाचे परिणाम हळूहळू दिसत आहेत. दिल्लीत ‘आप’ची सत्ता घालवण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर पूर्ण देशभरातून भाजपचे दिग्गज नेते उतरवले होते. एवढे सगळे दिग्गज नेते उतरवल्यानंतरही दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशावर ते आपला कब्जा करू शकलेले नाहीत. जिंकू शकलेले नाहीत. यातच पुढच्या भविष्याची दिशा दिसत आहे. दिल्लीकरांनी पूर्ण भाजपालाच नाकारले असून भाजपाचे जे प्रमुख दिल्लीत बसतात, त्यांनाच नाकारले असल्याचे आम्ही समजतो, असेही अनिल परब म्हणाले आहेत.