मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतील लेखक, भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे आज पहाटे त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यावर उद्या दादर येथील चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. या घटनेने आंबेडकरी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या मदतीने दलित पँथरची स्थापना त्यांनी केली होती. त्याआधी ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या राजा ढाले गटाचे प्रमुख होते.
१९९९ मध्ये राजा ढाले यांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकीच्या उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र ते निवडून आले नाहीत. ते एक बंडखोर लेखक म्हणून ओळखले जातात. मराठीतल्या सत्यकथेची सत्यकथा त्यांनीच लिहिली. महाराष्ट्रातल्या एका खेड्यात दलित तरुणीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर भारतीय स्वातंत्र्याबद्दल प्रश्न करणारा काळा स्वातंत्र्यदिन हा लेखही त्यांनी लिहिला होता. त्यांच्या परखड विचारांसाठी आणि आक्रमकतेसाठी ते प्रसिद्ध होते.