लखनऊ वृत्तसंस्था – अयोध्या आणि मिर्झापूर जिल्ह्यांतील ८ अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे. गायींच्या मृत्यूंप्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारने या अधिका-यांना निलंबित केले आहे.मिर्झापूरचे मुख्य पशू चिकित्सा अधिकारी, अयोध्येचे बीडीओ यांचा निलंबित अधिका-यांमध्ये सहभाग आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये बाराबंकी, रायबरेली, हरदोई, जौनपूर, आझमगढ, सुल्तानपूर, सीतापूर या ठिकाणी गोशाळांमधल्या अपु-या व्यवस्थेमुळे गायींचा मृत्यू झाला. त्यानंतर योगी आदित्यनाथ सरकारने आठ अधिका-यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिका-यांसोबत तातडीची बैठक घेतल्यानंतर मिल्कीपूरचे गट विकास अधिकारी, पशू आरोग्य अधिकारी मिल्कीपूर, ग्रामपंचायत अधिकारी पलियामाफी, मिल्कीपूर आणि प्रभारी कांजी हाऊस अयोध्यानगर डॉ. उपेंद्र कुमार आणि डॉ. विजेंद्र कुमार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तर, अनेक जिल्ह्यांतील जिल्हाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आदित्यनाथ यांनी अयोध्या, हरदोई, रायबरेली, मिर्झापूर, प्रयागराज, सीतापूर या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. गायींबाबत निष्काळजीपणा केला आणि त्यांचा मृत्यू झाला तर निष्काळजीपणा केल्याबद्दल गोहत्या अधिनियम आणि पशू क्रूरता निवारण कायद्यान्वये कारवाई केली जाईल असा या अधिका-यांना इशारा देखील योगींनी दिला आहे.