कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – गरिबांनी सत्तेमध्ये सहभागी झाले पाहिजे. यासाठी एकीची ताकद असली पाहिजे; पण दलितांची शक्ती विभागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकच, निळा झेंडा एकच, रिपब्लिकन पक्ष एकच. मग चळवळीमध्ये दुफळी का? असा प्रश्न उपस्थित करून यामध्ये प्रत्येकाच्या अंतर्मनातील बाबासाहेब आंबेडकर स्वीकारून, प्रत्येकाचे अस्तित्व आणि स्वातंत्र्य मान्य करून समाजकारणासाठी, आर्थिक समतेसाठी व परिवर्तनासाठी सर्व मतभेद विसरून राजकीय सत्ता मिळवण्यासाठी दलितांनी केवळ आंबेडकरांचे भक्त न बनता त्यांचे अनुयायी बनून ताकदीने एकत्र यावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
येथील गैबी चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांचा सत्कार व सामाजिक संघर्ष परिषदेत डॉ. सबनीस बोलत होते. अध्यक्षस्थानी सीमाभागातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युतराव माने होते. एस. संबोधी, आर. आनंद, प्रा. डॉ. अनिल माने, प्रा. श्रीधर शिंदे, मंगलराव माळगे, चंद्रशेखर कोरे, बी. आर. कांबळे, बाबासाहेब कागलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सबनीस म्हणाले, नवा इतिहास घडवायचा असेल तर जुन्या इतिहासाच्या विकृती नष्ट व्हायला हव्यात. यासाठी दलित चळवळीतून संवाद आणि संघर्ष झाला पाहिजे. या चळवळीतील माणसे निष्ठावंत आणि गोरगरिबांच्या वेदना जाणणारी आहेत. सत्यावर चालणारी ही चळवळ आहे. बौद्ध धर्मातील तत्त्वज्ञानाचा अंगीकार करून चळवळ ताकदवान बनत आहे; मात्र चळवळीसाठी, बळकटीसाठी एखादे राजकीय पद असले पाहिजे.
डॉ. अच्युतराव माने म्हणाले, आपण चळवळ उभारताना नेमके काय केले पाहिजे हे ठरवावे. अहंकारामुळे चळवळ व्यक्तिनिष्ठ बनता कामा नये. यासाठी पूर्वीच्या पँथरच्या चळवळीचे अनुकरण केले पाहिजे. चंद्रशेखर कोरे, दिलीप कांबळे, साताप्पा हेगडे, बाबासाहेब वाशीकर, अशोक असोदे, मल्लेश चौगुले, दीपक भोसले, कुमार कांबळे, मंगलराव माळगे, भंते एस संबोधी, श्रीधर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत बी. आर. कांबळे यांनी, प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाबासाहेब कागलकर यांनी केले. सूत्रसंचालन स्वप्नील पन्हाळकर यांनी, तर आभार अण्णासाहेब आवळे यांनी मानले. औरंगाबाद येथील कडूबाई खरात यांचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास सचिन मोहिते, विनोद कांबळे, अरुण कडाळे, बाळासाहेब वाशिकर, विलास भामटेकर, उत्तम साकेकर, अजित भोसले, दिनकर कांबळे, तानाजी कांबळे, विलास कांबळे, शरद कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.