श्रीनगर : वृत्तसंस्था – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील घडामोडींना वेग आला असून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे सुरक्षा व्यवस्था अधिकाधिक कडक केली जात आहे. केवळ स्थानिक लोकांनीच तिथे थांबावं असा आदेश सरकारने दिल्यामुळे येथे जाणाऱ्या सर्व यात्रेकरू आणि पर्यटकांना जम्मू काश्मीरमधून आपआपल्या राज्यात जाण्यास सांगण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनने देखील आता १०० हून अधिक खेळाडूंना काश्मीर सोडण्यास सांगितलं आहे. यात भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण चा देखील समावेश असून तो आणि त्याच्या स्टाफ मधील लोक आजच तिथून परतणार असल्याचे वृत्त आहे.
येथे जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशननं राज्यातील क्रिकेटर्सच्या निवडीसाठी आणि प्रशिक्षणासाठी शिबिर भरवलेल्या शिबिरात ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणाऱ्या घरेलू क्रिकेट सामन्यांसाठी अंडर २३ आणि वरिष्ठ गटातील खेळाडूंचे आठ संघ तयार केले गेले होते. १७ ऑगस्ट पासून दुलीप ट्रॉफी आणि त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी होणार असून २०१९-२० च्या या सत्रात होणाऱ्या सामन्यांपैकी काही सामने जम्मू काश्मीरमध्ये होणार होते. मात्र आता येथील स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असून परिस्थिती सुरळीत होऊन पूर्णतः नियंत्रणात आल्यानंतरच येथे स्पर्धा घेतल्या जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुखारी यांनी याबबाबत अधिकृत माहिती दिली. कँपमध्ये असलेल्या जवळपास १०२ खेळाडूंना परत पाठवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इथली परिस्थिती प्रचंड तणावपूर्ण असून नेमकं काय चाललंय ते कळत नाही त्यामुळे प्रशासनाच्या निर्देशानुसार खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.