नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. दिवाळीपर्यंत देशात कोरोना प्रसार नियंत्रणात येईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. अनंतकुमार फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नेशन फर्स्ट वेबीनार सीरिजचे उद्घाटन डॉ. हर्ष वर्धन यांनी केले.
करोना नियंत्रणात आणण्यासाठी भारताची कामगिरी चांगली आहे. यावर्षी दिवाळीपर्यंत कोरोना नियंत्रणाखाली येईल. नेत्यांसह सर्वसामान्य माणसांनी कोरोनाच्या साथीविरूद्ध एकजुटीसह प्रभावीपणे लढा दिला आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून येण्याच्या आधीच आरोग्य अधिकार्यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या आजपर्यंत 22 बैठका झाल्या आहेत, असेही हर्ष वर्धन म्हणाले. फेब्रुवारीपर्यंत एकच प्रयोगशाळा होती. त्यात वाढ करण्यात आली असून, देशभरात 1 हजार 583 प्रयोगशाळा आहेत. यापैकी एक हजाराहून अधिक सरकारी प्रयोगशाळा आहेत. देशात सुमारे दिवसाला 10 लाख चाचण्या घेतल्या जात आहेत.