मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – समाजवादी पार्टीचे नेते अबू आसिम आझमी यांनी 13 वर्षापूर्वी विद्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी गुन्हाच्या खटल्यातून निर्दोश मुक्तता करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या रेकॉर्डिंगच्या सीडीपैकी एक रिकामी निघाली तर एक सीडी न्यायालातील लॅपटॉपमध्ये चालवता आली नाही. तसेच एक कॅसेट चालवण्यासाठी काही साधनचं नव्हती. शिवाय पोलिसांना गुन्हा देखील सिद्ध करता आला नाही. त्यामुळे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अबू आझमी यांना त्यांच्याविरोधातील आरोपांतून निर्दोश मुक्त केले.
समाजवादी पार्टीने 3 फेब्रुवारी 2008 मध्ये शिवाजी पार्कवर सभा घेतली होती. त्यावेळी आझमी यांनी मनसेच्या परप्रांतीयांविरोधातील राजकारणावर टीका केली होती. भाषणादरम्यान आझमी यांनी महाराष्ट्रवासी व उत्तर प्रदेशवासीयांमध्ये जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी सपाच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपर येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पोस्टर फाडले, असा आरोप आझमी यांच्यावर करण्यात आला होता. आझमी यांच्या भाषणाची खातरजमा केल्यानंतर 10 फेब्रुवारी 2008 रोजी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते.
परंतु, एफआयआर नोंदवण्यात एक आठवडा विलंब झाल्यासंदर्भात योग्य स्पष्टीकरण देण्यात आले नाही. शिवाय या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम 117 (लोकांनी गुन्ह्यात सहभाग घेणे) लावले असले तरी किमान दहा जणांना आरोपी करणे आवश्यक असताना तसे करण्यात आलेले नाही. आरोपीने केलेले भाषण महाराष्ट्राविरोधी नसून ते भाषण मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात होते, हे सिद्ध झाले आहे. एक लहान कॅसेट चालवणारे साहित्यही नाही. त्यामुळे रेकॉर्ड केलेले ते भाषण आरोपीचे आहे की नाही याविषयी संशय निर्माण होतो, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने आझमी यांची निर्दोश मुक्तता केली.