बहुजननामा ऑनलाईन टीम – आयटी क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी माहिती मंगळवारी केली. आयटी क्षेत्रातील 85 टक्के काम घरुनच केले जात असून वर्क फ्रॉम होमसाठी देण्यात आलेल्या कालावधी 30 एप्रिल रोजी संपत होता. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर प्रसाद यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान त्यांनी ही घोषणा केली.
राज्यातील आयटी सेक्रेट्री, कम्युनिकेशन सेक्रेट्री आणि पोस्टल सेक्रेट्रींनी प्रेझेंटेशन सादर करुन कोणकोणत्या गोष्टींची राज्यांना केंद्राकडून अपेक्षा आहे हे सांगितले. वर्क फ्रॉम होमसंदर्भात सरकारने अनेक सवलती दिल्या असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. तसेच घरुन काम करण्याचे नियम शिथिल करण्यात आले आहे. घरुन काम करणे हे सर्वसामान्य व्हावे यासाठी आम्हा प्रयत्नशील आहोत. नवीन उद्योजकांनी या संदर्भातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी अशी अपेक्षाही प्रसाद यांनी व्यक्त केली. सरकारकडून देण्यात आलेल्या सवलतींमध्ये सुरक्षा ठेवींमध्ये सूट, काही ठिकाणी व्हिपीएन न वापरता काम कऱण्याची सूट, घरी काम करण्यासंदर्भात उपकरणे पुरवण्यासाठी परवानगीमध्ये सूट देण्याचा समावेश आहे.
13 मार्च रोजी सरकारने आयटी कंपन्यांनी घरुन काम कऱण्याची परवानगी देण्यासंदर्भात सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार 30 एप्रिलला हा कालावधी संपणार होता. मात्र आता तो वाढवण्यात आला आहे. भारतामधील आयटी क्षेत्रातील प्रमुख केंद्र असणार्या बंगळुरु, हैदराबाद, मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक असल्याने येथील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, हरयाणा आणि तेलंगणामधील माहिती तंत्रज्ञान विभागांच्या अधिकार्यांशी चर्चा करताना प्रसाद यांनी राज्य सरकारांनी ‘भारत नेट’ प्रकल्पाला सहाय्य करण्याची मागणी केली. ‘भारत नेट’च्या माध्यमातून इंटरनेटचे जाळे अधिक भक्कम करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंटरनेट सेवा पुरवणार्यांना अधिक चांगल्या सेवेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी नवीन उपकरणे बसवण्यासंदर्भात राज्य सरकारने परवानगी देण्यासंदर्भातही प्रसाद यांनी सुचना केल्या.